संतोष,
तूझी "ते ही खरेच आहे. नाहीतर या वयात कोणी phd ते ही XLRi सारख्या top college मधून करायचे धाडस कोंनकरणार ?"
ही प्रतिक्रिया वाचली, त्यामुळे तू XLRi सारख्या top college मधून phd करतोय हे समजले. XLRi हे top college आहे हेही समजले.
सर्व प्रथम तू phd करतोय या साठी मनःपूर्वक सदिच्छा!
Ph.D. ही संशोधना साठी देण्यात येणारी पदवी आहे. माझे शिक्षण अल्पस्वल्प असल्याने सर्व ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, Ph.D. धारकांविषयी माझ्या मनात अतीव आदर आहे. Ph.D. साठी प्रचंड बौद्धिक कष्ट करावे लागतात, संशोधन करावे लागते, मोठाच सवापसव्यय असतो याची मला कल्पना आहे.
नावाच्या आधी Dr लावणारे अनेक लोक माझ्या जवळच्या परिचयाचे आहेत काही मित्रही आहेत.
त्यामुळे त्यांच्या व अनेकांच्या Ph.D. चे किस्से, कहाण्या, अनुभव माहिती आहेत. काही गमतीशीर आहेत, काही मनापासून दाद द्याव्यात अशा आहेत तर काही चीड आणणाऱ्याही आहेत.
मी दहावीत असताना म्हणजे 1975-76 साली आम्हाला अनिल सहस्रबुद्धे नावाचे शिक्षक शिकवायला होते, ते त्याकाळात Ph.D. करीत होते. त्याकाळात साधनसामुग्री जी आता सहज उपलब्ध आहे ती अजिबात नव्हती. त्यांचा संशोधनाचा विषय 'चाळीस गाव डांग भाषा आणि व्याकरण' असा काहीसा होता. चाळीस गाव डांग म्हणजे आमच्या अकोले व शेजारील तालुक्याचे भागातील आदिवासी जमाती त्यात कोळी, महादेव कोळी, ठाकर इत्यादी जमाती येतात; यांची संस्कृती, त्यांची बोली भाषा, त्या भाषेचे व्याकरण असा तो विषय होता.
त्यामुळे त्यांना या जमातीच्या निरनिराळ्या सण, समारंभ, मयत, जन्म, यात्रा, जत्रा, त्यांचे देव, परंपरा इत्यादी याचा सखोल अभ्यास करावा लागत होता, त्यासाठी अशा कार्यक्रमांना हजेरी लावणे, ते अभ्यासणे, माहिती घेणे असा बराच उपद्व्याप करावा लागायचा, यांची भाषाही वेगळी असल्याने ती समजायला कठीण, कर्ता कर्म क्रियापद या तीन गोष्टी एकत्र आल्या की आपलं वाक्य बनतं, पण या आदिवासींची भाषाही वेगळी आणि व्याकरणही वेगळं त्यामुळे ती समजायलाही कठीण, काळ 1975-76चा त्याकाळात वाहनांची वानवा, या आदिवासी गावात जाण्यासाठी वाहने नसायची, या आदिवासी दुर्गम भागात वाड्या-वस्त्यांवर पोहोचायला रस्तेही नसायचे त्यामुळे मैलोनमैल चालणे, सायकल असा प्रवास करायला लागायचा, काही कार्यक्रम रात्री असायचे त्यामुळे त्या वाडी-वस्तीतच अनोळखी ठिकाणी मुक्काम करायचा. काही वर्षे प्रचंड शारीरिक, आर्थिक, मानसिक आणि बौद्धिक कष्ट आमच्या या सहस्त्रबुद्धे सरांनी घेतले होते.
त्यात त्यांना आलेला एक गमतीशीर अनुभव त्यांनी सांगितला होता. आमचा तालुका आदिवासी तालुका, त्यामुळे तालुक्याचे आमदार आदिवासी राखीव गटातील, त्यावेळेस एक अतिशय सालस, विनम्र, निरागस, भाबडे असं व्यक्तिमत्व असलेले यशवंतराव भांगरे नावाचे शेंडी(भंडारदरा) गावचे आमदार होते. रस्त्याने चालताना (हो त्यावेळेस आमदार गल्ली बोळातून, रस्त्याने चालायचे, विधानसभा अधिवेशनासाठी मुंबईला जाताना-येताना एस.टी.च्या लाल डब्याने प्रवास करायचे) समोर अगदी दोन वर्षाच नागडं पोर जरी आले तरी दोन्ही हात जोडून नमस्कार करायचे, मोठ्यांना तर करायचेच. कधीही कोणत्याही प्रकारच्या मदतीला ते तत्पर असायचे. आमच्या सरांनी त्यांना भेटून ते आदिवासींच्या संस्कृती आणि भाषेवर Ph.D. करीत असल्याचे सांगून त्यांची मदत हवी असल्याचे सांगितले (सरांचा हेतू आमदार महाशय हे आदिवासी समाजाचे आहेत शिवाय लोकप्रतिनिधी असल्याने त्यांना भाषा आणि संस्कृती या विषयी अधिक माहिती असेल व ती त्यांच्याकडून मिळेल ही अपेक्षा) त्यावर या महोदयांनीही मनापासून मदत करण्याच्या हेतूने सरांना तुम्ही मुंबईला या मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्याला भेटून तुमचे Ph.D. चे काम करून टाकू, तुम्ही निर्धास्त रहा, असे आश्वासन दिले. आमदार महोदयांचे शिक्षण जेमतेम असल्याने Ph.D. हा नेमका काय प्रकार आहे? याची माहिती नसल्याने परंतु मदत करण्याच्या आंतरिक भावनेने ते बोलून गेले. ऐसा भी होता है। यावर आम्ही खूप हसलोही होतो.
त्यानंतर एका कॉलेजचे प्राध्यापक आपल्या अगदी जवळचे असलेले तेही Ph.D. करीत होते, (त्या प्राध्यापकांवर एक कादंबरीही लिहिता येईल एवढं मटेरिअल आहे.) अनेक प्रयत्न करूनही त्यांना Ph.D. मिळत नव्हती, Ph.D. द्यावी असं त्यांचं काम बहुतेक नसावं, अनेक viva झाल्या पण त्यात त्यांना यश मिळाले नाही. अगदी शेवटचा प्रयत्न त्यांनी कमिटी पुढे केला, ते कमिटीपुढे आले चक्क सगळ्यांच्या पाया पडले, आणि कळकळीने विनंती केली, माझी आई शेवटच्या घटका हॉस्पिटलमध्ये मोजती आहे, तिला तिच्या मृत्यूपूर्वी मला डॉक्टर झालेले पहायचे आहे, तिची शेवटची इच्छा आपण पूर्ण करावी म्हणून हात जोडले. Ph.D. पदरात पडून घेतली.
कॉलेजच्या शिक्षकांना (त्यांना बोलीभाषेत प्राध्यापक म्हणतात) Ph.D. केल्यानंतर दोन ते पाच वेतनवाढीचे फायदे दिल्या जातात हा मोठा आर्थिक लाभ असतो, बहुतेक सर्व प्राध्यापक (काही सन्मान्य अपवाद वगळता) हा आर्थिक लाभ डोळ्यासमोर ठेवूनच Ph.D. करतात.
चार-पाच प्राध्यापक माझ्याकडे Ph.D. करावी किंवा नाही? केल्यास काय व किती फायदे होतील? हे विचारण्यासाठी व चर्चा करण्यासाठी भेटून गेले. एक जण तर त्यासाठी खास नाशिकहुन आले होते. या प्राध्यापकांची भयानक चीड आली होती.
Ph.D. करण्यासाठी येणारा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष खर्च, करावी लागणारी मेहनत (इंटरनेटवरून कॉपी-पेस्ट), शिल्लक नोकरीचे वर्ष, मिळणारा इन्क्रीमेंटचा फायदा याचा आर्थिक ताळमेळ घालू पाहत होते.
संशोधन- Ph.D साठीची आवश्यक बाब, संशोधनातून नवीन गोष्टी बाहेर याव्यात, नव्याने आकलन व्हावे, संशोधनाचा फायदा समाजाला व्हावा, उन्नती व्हावी, निसर्ग/पर्यावरणास मदत व्हावी अशी सर्वसाधारणपणे उद्दीष्टये असतात, असावीत पण या प्राध्यापक महाशयांचा हेतू हा केवळ आर्थिक स्वार्थाचाच होता.
दोन-तीन महितीतले प्राध्यापक रिटायर्ड होण्याच्या शेवटच्या महिन्यात Ph.D. मिळवून घेतली, कारण फक्त आर्थिक फायदा! त्यांनी केलेल्या संशोधनाच्या एक तासाचेही लेक्चर विद्यार्थ्यांपुढे झाले नाही. तर एका प्राध्यापकाने हाताखालच्या Ph.D. होल्डर प्राध्यापकाकडून Ph.D.चे सर्व काम उक्ता मोबदला ठरवून करवून घेतले.
Ph.D. करणारांमध्ये महाविद्यालयीन प्राध्यापकांची संख्या मोठी आहे, आणि त्याचे कारणही आहे. जे नेट-सेट नाहीत त्यांना Ph.D. कंपल्सरी केलेली होती. शिवाय प्राचार्य पदासाठीही Ph.D. आवश्यक ठेवलेली आहे. त्यामुळे ज्यांना प्राचार्य बनायचे त्यांनीही Ph.D. केल्या. मागील काही वर्षात अक्षरशः हजारो-लाखोंच्या संख्येत प्राध्यापकांच्या Ph.D. झालेल्या आहेत. या प्राध्यापकांच्या Ph.D. चे विषय हाही संशोधनाचा विषय ठरू शकतो.
*शासकीय अनुदानित महाविद्यालयाच्या प्राध्यापकांव्यतिरिक्त Ph.D. करणाऱ्या विद्यार्थ्यांचे खरे कौतुक आहे. कारण निव्वळ संशोधनाच्या हेतूने प्रामाणिकपणे केलेल्या त्या Ph.D. आहेत कारण त्यांना या प्राध्यापकांप्रमाणे डायरेक्ट कोणतेही आर्थीक फायदे नाहीत.*
Ph.D. करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व्यथाही लक्षणीय आहेत.
या विद्यार्थ्यांचे त्यांच्या गाईड कडून आर्थिक, शारीरिक, मानसिक शोषणाचे किस्सेही चीड आणणारे आहेत. त्यावरही खूप लिहिता येईल. अशा प्रतिकूल स्थितीतही त्यांचे Ph.D. करणे खूपच कौतुकास्पद आहे.
आज Ph.D. केलेल्या लोकांची संख्या काही लाखात आहे, पण त्या लाखो Ph.D. चा सुयोग्य परिणाम समाजावर, आर्थिक व इतर गोष्टीत सर्वसामान्य माणसांना दिसत नाही. हेही तितकेच खरे आहे, या विषयावरही एक Ph. D. होऊ शकेल.
*राजेंद्र धारणकर*